वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी (Bribe) उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. वाहनचालकाकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना आढळून आल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हागारांवरच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे.
पुणे शहरात वाहतुक कोंडीची गंभीर समस्या बनलेली आहे. वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचललेणे किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलीस कर्मचारी मग्न असल्याचे दिसून येतात. अनेकदा पोलीस चौकात न थांबता आडबाजूला थांबलेले दिसून येतात. पोलीस कर्मचारी टोळक्याने चौकात थांबून वाहन चालकांना अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाईला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकाकडून मोठ्या रक्कमेची मागणी करुन त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देतात.
वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
यामुळे चिरीमिरी घेणाऱ्या वाहतूक पोलिसांवर वचक बसणार आहे.
अशी होणार कारवाई
पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात वाहन चालक म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणार आहेत.
वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची
या पथकाकडून पाहणी केली जणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर
खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.