पुणे : पुणे महापालिका समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रतिदिन दोनशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार आहे, अशी माहीती पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील पाणी प्रश्न हा गंभीर बनला आहे. वडगांव शेरी मतदारसंघातील खराडी आदी भागात पाणी प्रश्न गंभीर झाला असुन, नुकतेच माजी नगरसेवकाने खड्डयात बसुन पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. समाविष्ट गावांतील पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले असले तरी अद्याप ते पुर्ण झाले नाही. महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नाही अशा तक्रारी समाविष्ट गावातून सातत्याने केल्या जात आहेत. तसेच उपनगरातील नागरीकांकडूनही पाण्याच्या प्रश्नावर महापालिकेत सातत्याने आंदोलन, निवेदने दिली जात आहेत.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नुकतेच पाणी पुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती.यामध्ये समाविष्ट गावांना ग्रामपंचायत असताना ज्या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येत होता, त्याची माहिती
व सध्याची लोकसंख्या विचारात घेउन दरडोई १५५ लि. पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना करण्यातआल्या आहेत. यासाठी टँकरची संख्या वाढविण्याचे तसेच गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी सिंटेक्सच्या टाक्या ठेवण्यासाठी सांगण्यात आले आहे.सध्या शहरात दररोज टँकरच्या बाराशे फेर्या होतात. यामध्ये आणखी दोनशे फेर्यांची वाढ होणार आहे.वेळेत टँकर पोहोचावेत यासाठी काही ठिकाणी वन विभागाच्या जागेतील खराब रस्त्यांची समस्या जानवत आहे.ती दूर करण्याचेही पथ विभागाला सांगण्यात आले आहे.पाटबंधारे विभागाकडून सुमारे ६५० कोटी बिलाची आकारणी करण्यात आली आहे.याबाबत दाद मागण्यात येणार असल्याचे भोसले यांनी नमूद केले.